बुलढाणा | प्रतिनिधी :
चौथा ग्रामपंचायत कार्यालयाच्या कथित भ्रष्ट व मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मागील पाच वर्षांत गावाचा अपेक्षित विकास झाला नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गावातील मुख्य वर्दळीचा रस्ता, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा मार्ग तसेच बसस्टॉपकडे जाणारा आणि मलकापूर-लोणार-मेहकर समृद्धी महामार्गाला जोडणारा प्रमुख रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी तसेच मागील पाच वर्षांतील सरपंच मंडळावर विकासकामांमध्ये दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. काही ग्रामस्थांनी निधीच्या वापराबाबतही शंका उपस्थित करत कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.
माहिती अधिकारांतर्गत माहिती मागण्यासाठी गेलेल्या नागरिकांना टोलवाटोलवी केली जाते तसेच धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. ग्रामसेवक आणि सरपंच एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घ्यावी व चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांकडे केली आहे.
