पुणे | प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने “समरसता लोककला संमेलन २०२६” या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले आहे.
या संमेलनाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीधर मोहोळ, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाचे अध्यक्ष म्हणून रघुवीर खेडकर तर स्वागताध्यक्ष म्हणून धीरज घाटे यांची निवड करण्यात आली आहे.
संमेलनात महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये लोककला दिंडी, दुर्मिळ लोकवाद्य प्रदर्शन, पारंपरिक लोककला दर्शन, विशेष मुलाखती, कवी संमेलन, चर्चासत्र तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
कवी संमेलनात तुकाराम धांडे, वा. ना. आंधळे आणि युवा कवी कुमार चव्हाण सहभागी होणार आहेत. तसेच साहित्य, लोककला आणि संस्कृती विषयांवर विविध मान्यवर विचारवंत मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी रघुवीर खेडकर आणि नंदेश उमप यांची विशेष मुलाखत संदीप पाठक घेणार आहेत.
गोंधळी, वासुदेव, शाहिर, लावणी, दशावतार, आदिवासी नृत्य, झाडीपट्टी यांसह राज्यभरातील सुमारे १५० लोककलावंतांच्या सहभागातून लोककलांचे सादरीकरण होणार आहे. तसेच दुर्मिळ लोकवाद्यांचे प्रदर्शन आणि लोकपरंपरेशी संबंधित विविध उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
संमेलनाच्या निमित्ताने साहित्य, संस्कृती आणि लोककला क्षेत्रातील कलाकार, साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारा ठरणार आहे.
दूरवरून येणाऱ्या रसिकांसाठी आयोजकांकडून विनामूल्य निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. लोणी गावचे सुपुत्र, लोककला अभ्यासक व लेखक शाहीर राहूल कुसुम रामचंद्र सोनावणे आणि समरसता साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. विजय मोरे यांनी लोणी पंचक्रोशीतील कलाकार आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
