प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या कोल्हापूर येथे त्यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी जिल्हा प्रशासन व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने २६ जून २०२६ रोजी भव्य ‘समता दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून उत्साहात साजरा केला जाणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळावर अभिवादनाने होईल. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता ‘समता दिंडी’ला प्रारंभ होणार आहे.
ही दिंडी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या स्थळांवरून मार्गक्रमण करणार असून त्यामध्ये ऐतिहासिक दसरा चौक, छत्रपती राजाराम महाराज पुतळा (व्हीनस कॉर्नर), माईसाहेब महाराज पुतळा, ऐतिहासिक बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय परिसराचा समावेश आहे. दिंडीची सांगता ऐतिहासिक दसरा चौक मैदानात होणार आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या समता, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिक, युवक, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांनी मोठ्या संख्येने या ‘समता दिंडी’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
