प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत आदर्श ग्राम बनविण्याचा संकल्प
अक्कलकोट | प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील गांधीनगर सोळसे लमाण तांडा ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा भीमनगर येथे उत्साहात संपन्न झाली.
यावेळी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना (PM-AJAY) अंतर्गत राज्यातील निवड झालेल्या ७४१ गावांमध्ये भीमनगर गावाचा समावेश झाल्याची माहिती ग्रामसेवक संदीप पाचंगे यांनी दिली.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना (PM-AJAY) अंतर्गत महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांमध्ये दि. २३ जून ते २५ जून २०२६ या कालावधीत विशेष ग्रामसभा व संयुक्त पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेची जनजागृती, गावांच्या विकासात्मक गरजांची ओळख, ग्राम विकास आराखडे (VDPs) तयार करणे तसेच त्यांना ग्रामसभेची मंजुरी मिळवून देणे, अशी कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच ज्या गावांचे ग्राम विकास आराखडे तयार झाले आहेत, त्यांना जिल्हास्तरीय समितीची अंतिम मान्यता दिली जाणार आहे.
ग्रामसेवक संदीप पाचंगे यांनी सांगितले की, ज्या गावांचे गुणांकन ७० किंवा त्यापेक्षा अधिक असेल, त्या गावांना ‘आदर्श ग्राम’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे. तसेच आदर्श ग्राम म्हणून घोषित झालेल्या गावांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी समन्वय साधण्यावर भर दिला जाणार आहे.
या विशेष ग्रामसभेस ज्येष्ठ नागरिक शरणप्पा जन्ना, रिपाइंचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, डाटा ऑपरेटर चिदानंद शिंगे, हणमंत झळकी, लक्ष्मण लोड्डेन, गौतम झळकी, विजयकुमार धोडमनी, निर्मला गायकवाड, पत्रकार निंगप्पा निंबाळ, खाजप्पा शिंगे ऊर्फ गायकवाड, लक्ष्मण रेऊरे, रवी धोडमनी, भीमा गायकवाड, सचिन धोडमनी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
