कुरुंदवाडमध्ये वटपौर्णिमेनिमित्त सुहासिनींकडून वटवृक्ष पूजन उत्साहात
प्रतिनिधी :
कुरुंदवाड : वटसावित्री अर्थात वटपौर्णिमा हा सण विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी महिलांनी सोमवारी पारंपरिक उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली. “जन्मोजन्मी हाच पती लाभो” अशी प्रार्थना करत शहरातील सुवासिनींनी वटवृक्षाचे पूजन केले.
सावित्रीने आपल्या निष्ठा, बुद्धिमत्ता आणि धैर्याच्या बळावर यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले, या पौराणिक कथेनुसार वटसावित्री व्रताचे विशेष महत्त्व मानले जाते. त्यामुळे या दिवशी महिलांकडून वटवृक्षाची पूजा केली जाते.
सोमवारी सकाळपासूनच गणपती मंदिर परिसरासह शहरातील विविध भागांतील वटवृक्षांजवळ महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी वडाच्या झाडाला हळद-कुंकू वाहून विधिवत पूजा-अर्चा केली. वटवृक्षाभोवती कच्चा सूत गुंडाळत प्रदक्षिणा घालून पतीच्या दीर्घायुष्याबरोबरच कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.
पूजेदरम्यान महिलांनी फळे, फुले, भिजवलेले हरभरे अर्पण केले. सकाळी ६.३० ते दुपारी १२.३० या वेळेत पूजा करणे फलदायी मानले जात असल्याने महिलांनी मोठ्या भक्तिभावाने व्रत पूर्ण केले.
सकाळी आठ वाजल्यापासून हातात पूजा साहित्याचे ताट व वाण घेऊन महिला वडाच्या झाडांकडे जात असल्याचे चित्र दिसून आले. पूजा झाल्यानंतर महिलांनी एकमेकींना कुंकुम तिलक लावत शुभेच्छा दिल्या तसेच वाण देऊन सणाचा आनंद लुटला.
दिवसभर गणपती मंदिर, डॉ. अल्लमा उर्दू हायस्कूल, स्वामी समर्थ कट्टा कुरुंदवाड-भैरववाडी परिसरातील वटवृक्षांजवळ महिलांची विशेष गर्दी पाहायला मिळाली.
