कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील एकसळ–आंबिवली गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असले, तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्टी (शोल्डर) चे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रस्ता काँक्रिटीकरणामुळे प्रवास अधिक सुलभ झाला असला, तरी साईड पट्टी नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला उंचीचा फरक निर्माण झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना वाहन घसरून अपघात होण्याचा धोका वाढला असून पावसाळ्यात हा धोका अधिक गंभीर होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे साईड पट्टीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. तसेच रस्ता पूर्णपणे सुरक्षित होण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, रस्त्याचे मुख्य काम पूर्ण झाले असले तरी साईड पट्टीचे काम रखडल्याने संपूर्ण प्रकल्पाचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने तातडीने लक्ष घालून उर्वरित काम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
