पावसाळ्यात तातडीने दुरुस्ती करण्याची चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांची मागणी
जत / प्रतिनिधी : वळसंग ते काराजनगी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या मार्गावरून शाळेसाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने पावसाळ्यात तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी भाजप नेते व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी माध्यमांशी बोलताना केली.
श्री. कुंभार म्हणाले की, वळसंग ते काराजनगी या गावांदरम्यान सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतर असून या रस्त्यावरून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी वळसंग येथे ये-जा करतात. मात्र ऐन पावसाळ्यात पायी किंवा सायकलने प्रवास करताना विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणी व समस्यांचा सामना करावा लागत आहे.
वळसंग गावातून काराजनगीकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असून गावकऱ्यांनी लोकवर्गणी आणि श्रमदानातून या रस्त्याचे मुरमीकरण केले आहे. तरीही पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याने वाहनचालकांना दुचाकी व चारचाकी वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा वाहने घसरून अपघातही होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली असून दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून काटेरी झुडपे मुळासकट काढावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे खराब होत असल्याने प्रशासनाने या रस्त्याच्या कामास मंजुरी देऊन युद्धपातळीवर दुरुस्ती पूर्ण करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, असे आवाहन चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केले.
