अभिनेते आमिर खान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद
दर्यापूर प्रतिनिधी : पानी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित ‘फार्मर कप २०२६’ उपक्रमाचा शुभारंभ सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कृषिमंत्री तसेच पानी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे तालुकास्तरीय प्रक्षेपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला फार्मर कप उपक्रमात सहभागी झालेले पुरुष व महिला शेतकरी बचत गटांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी आरती साबळे यांनी उपस्थित शेतकरी गटांशी संवाद साधला. तसेच तालुक्यातील युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी कुलदीप टोळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण परिसरात महिलांच्या हस्ते वटवृक्षाचे वृक्षारोपणही करण्यात आले. झूम लिंकद्वारे तालुक्यातील अनेक शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही केवळ स्पर्धा नसून शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचे सर्वात मोठे यश आहे.” पुढील काळात हेच शेतकरी गट इतर शेतकऱ्यांना एकत्र आणून शेती विकासासाठी प्रेरणा देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले की, गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे. सामूहिक नियोजनातून शेती अधिक सक्षम आणि फायदेशीर होऊ शकते.
यावेळी अभिनेते आमिर खान यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “मार्गदर्शक शेतकरी गट हे शेती क्रांतीचे शिल्पकार ठरणार आहेत. डिजिटल माध्यम आणि प्रत्यक्ष संवाद यांच्या प्रभावी संगमामुळे हा उपक्रम अधिक यशस्वी ठरेल.”
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी तालुक्यातील शेतकरी गट, कृषी विभाग आणि उमेद अभियानाच्या मार्गदर्शकांशी थेट संवाद साधला.
या कार्यक्रमाला सर्व कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ अधिकारी तसेच कृषी विभाग व आत्मा प्रकल्पाचे क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
