करमाळा (प्रतिनिधी) : मांगी तलावातील पाणी हळगाव येथील कृषी महाविद्यालयाला देण्याच्या प्रस्तावावरून करमाळा तालुक्यात निर्माण झालेल्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या संदर्भातील वस्तुस्थितीचा अहवाल मुख्य अभियंत्यांनी सादर करेपर्यंत कोणतीही पुढील कारवाई करू नये, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
सोलापूर जिल्हा परिषद भाजप गटनेत्या रश्मी बागल यांनी जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याबाबत भूमिका मांडली. मांगी तलावात अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्याची व्यवस्था केल्याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातील हळगाव कृषी महाविद्यालयाला पाणी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
रश्मी बागल यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मांगी तलावाची साठवण क्षमता वाढवून त्यामध्ये दीड टीएमसी पाणी सोडण्याची व्यवस्था प्रथम करण्यात यावी. त्यापैकी एक टीएमसी पाणी करमाळा तालुक्यासाठी राखीव ठेवून उर्वरित पाणी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी देण्याचे नियोजन करता येईल. मात्र सद्यस्थितीत करमाळा तालुक्याच्या गरजा पूर्ण न होता पाणी वळविण्याचा निर्णय अन्यायकारक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मांगी तलावातील पाणी हळगाव कृषी महाविद्यालयाला देण्याच्या निर्णयानंतर करमाळा तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्र्यांनी मुख्य अभियंत्यांकडून वस्तुस्थिती अहवाल मागवून तो प्राप्त होईपर्यंत कोणतीही कार्यवाही न करण्याचे निर्देश दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
