कडेगाव | प्रतिनिधी
कडेगाव येथील एसटी स्थानक आणि ग्रामीण रुग्णालयातील समस्या अद्याप कायम असून, अडीच वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनानंतरही परिस्थितीत कोणताही लक्षणीय बदल न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा जनसेवक डी. एस. देशमुख यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मागील अडीच वर्षांपूर्वी डी. एस. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाणी संघर्ष समिती आणि कडेगाव ग्रामस्थांनी एसटी स्थानक परिसरातील साचलेले पाणी, डबकी, अस्वच्छ शौचालये व मुताऱ्या तसेच ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या आरोग्यसेवा आणि अस्वच्छतेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले होते. त्यावेळी प्रशासनाकडून विविध आश्वासने देण्यात आली होती. मात्र आजही परिस्थिती जैसे थे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कडेगाव हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून दररोज हजारो प्रवासी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील नागरिक एसटी स्थानक व ग्रामीण रुग्णालयाचा वापर करतात. तालुक्याची ओळख असलेल्या या दोन्ही ठिकाणी आजही घाणीचे साम्राज्य, दुर्गंधी, साचलेले पाणी आणि अपुऱ्या सुविधा असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामीण रुग्णालयातही स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि आवश्यक सेवांबाबत अनेक प्रश्न कायम आहेत. “विकास” आणि “स्वच्छ भारत”च्या घोषणा केवळ भाषणांत दिसतात; प्रत्यक्षात मात्र तालुक्याच्या मुख्य ठिकाणाची अवस्था अत्यंत लाजीरवाणी असल्याची टीका डी. एस. देशमुख यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, “निवडणुकांच्या काळात जनतेच्या समस्या लक्षात घेतल्या जातात; मात्र निवडून आल्यानंतर नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही दुर्लक्ष करतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना अस्वच्छता आणि गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.”
यावेळी त्यांनी संबंधित प्रशासन, एसटी महामंडळ, ग्रामीण रुग्णालय प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन नियमित स्वच्छता, आवश्यक दुरुस्ती, स्वच्छ पाण्याची व्यवस्था, पुरेसे कर्मचारी आणि सातत्यपूर्ण देखभाल यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.
“आता आश्वासने नकोत, कृती हवी. अन्यथा अडीच वर्षांपूर्वीपेक्षाही अधिक तीव्र जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी. एस. देशमुख यांनी दिला आहे.
