कन्नड | प्रतिनिधी
पंचायत समिती अंतर्गत गुरुवार दि. २ जुलै २०२६ रोजी गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत नादरपूर येथे रोजगार हमी विभागामार्फत “विकसित भारत – रोजगार आणि आजीविका हमी मिशन (ग्रामीण)” अर्थात विकसित भारत जी-राम-जी कायदा २०२५ अंमलबजावणी व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना पूर्वीच्या मनरेगा कायदा २००५ आणि नव्याने लागू करण्यात आलेल्या विकसित भारत जी-राम-जी कायदा २०२५ मधील बदल, त्याची अंमलबजावणी, उद्दिष्टे आणि वैशिष्ट्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. या कायद्याची अंमलबजावणी २ जुलै २०२६ पासून संपूर्ण देशभर करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान गावातील ज्या मजुरांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत १०० दिवसांपेक्षा अधिक काम केले, अशा दोन मजुरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर गावामध्ये प्रभात फेरी काढून नवीन कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच हक्क संरक्षण प्रतिज्ञा घेण्यात आली आणि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
या कार्यक्रमाला सरपंच निकम, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी विजयकुमार पंडीत, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संदीप गोंडाळ, तांत्रिक सहाय्यक दिग्विजय सोळुंके, महादेव कटके, पंढरीनाथ जाधव, विनोद अल्हाट, गौरव उगले, आकाश घडसे, भरत शेळके, संगणक प्रचालक गणेश चव्हाण, महेश लाटणे, दिनेश घोडके, गीतांजली कीर्तीशाही, ग्रामपंचायत अधिकारी बनकर तसेच ग्रामस्थ, शेतकरी, पंचायत समिती अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
