एस.टी. बसेसचा हॉटेल आम्रपाली थांबा अखेर रद्द
कन्नड | प्रतिनिधी
धुळे – सोलापूर महामार्गावरील पळसवाडी येथील हॉटेल आम्रपाली येथील एस.टी. बसथांबा अखेर रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना धुळे, शिव परिवहन वाहतूक व कामगार सेना धुळे आणि विभाग नियंत्रक धुळे आगार यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
या संदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभाग नियंत्रक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात तसेच हॉटेल आम्रपालीचे मालक दत्तात्रय कचरू खोसरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, पळसवाडी येथील हॉटेल आम्रपाली येथे परिवहन महामंडळाच्या ३० साध्या बसेसना अधिकृत थांबा देण्यात आला होता.
मात्र, या ठिकाणी प्रवासी तसेच चालक-वाहकांकडून वारंवार विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामध्ये प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसणे, स्वच्छतेचा अभाव, अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत नाराजी, चालक-वाहकांशी हॉटेल व्यवस्थापकाची अरेरावी, गैरवर्तन, शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक देणे तसेच बसेस वळविण्यासाठी पुरेशी जागा नसणे आदी बाबींचा समावेश आहे.
तसेच या प्रकारांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महामंडळाची प्रतिमा मलीन होत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सदर बसथांबा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विभाग नियंत्रकांनी स्पष्ट केले आहे.
