तेल्हारा | प्रतिनिधी
पंचगव्हाण फाटा ते निंभोरा मुख्य रस्त्यावरील नाल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून पक्का पूल नसल्यामुळे पावसाळ्यात स्थानिक नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून, थोडासा जरी जोरदार पाऊस झाला तरी या नाल्याला पूर येतो. त्यामुळे गावाचा मुख्य रस्त्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटतो. अशा परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात नेणे तसेच नागरिकांना दैनंदिन कामासाठी बाहेर पडणेही कठीण बनते.
मागील वर्षी नाल्यावरून पाणी वाहत असताना एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तरीही प्रशासनाकडून अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
पूरस्थिती निर्माण झाल्यास शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घरीच थांबावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन नाल्यावर मजबूत आणि पक्का पूल बांधावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
