आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचा गौरव
प्रतिनिधी
अमेरिकेतील प्रसिद्ध पोर्टलँड स्टेट युनिव्हर्सिटी येथे आयोजित जागतिक परिषदेत भारताचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ. दिलीप पाटील यांना उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून अत्यंत प्रतिष्ठेचा ‘चेअरमन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला आहे.
या जागतिक परिषदेसाठी जगभरातून निवडक १५० तज्ज्ञ प्राध्यापकांची निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे, संपूर्ण भारतातून एकमेव प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याचा मान डॉ. दिलीप पाटील यांना मिळाला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे देशाच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे गावचे सुपुत्र असलेले डॉ. दिलीप पाटील यांनी ग्रामीण भागातून शिक्षण क्षेत्रात मोठी भरारी घेत जागतिक स्तरावर आपली छाप निर्माण केली आहे. उत्कृष्ट अध्यापन, विद्यार्थ्यांना दिलेले प्रभावी मार्गदर्शन आणि शैक्षणिक व्यवस्थापनातील योगदान याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पोर्टलँड स्टेट युनिव्हर्सिटीच्या व्यासपीठावर मिळालेला हा पुरस्कार केवळ डॉ. पाटील यांच्यासाठीच नव्हे, तर महाराष्ट्र आणि भारतासाठीही अभिमानाची बाब मानली जात आहे.
डॉ. पाटील यांच्या या यशामुळे सोनवडे गाव, शाहूवाडी तालुका तसेच मुंबई विद्यापीठ परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजमाध्यमांवर तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
