रिसोड प्रतिनिधी :
रिसोड शहरात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असताना नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वाढीव वीजबिलांचा आरोप आणि तांत्रिक समस्यांमुळे नागरिक, शेतकरी तसेच मजूर वर्ग त्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरातील अनेक भागांत दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. काही ठिकाणी काही मिनिटांच्या अंतराने वीज ये-जा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असले तरी काही भागांत काम अपूर्ण अवस्थेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच मीटर रीडिंग योग्य पद्धतीने न घेता जास्तीची बिले दिली जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची भावना वाढत आहे.
वीजपुरवठ्याशी संबंधित समस्यांबरोबरच शहरातील काही ठिकाणी वीजवाहिन्या लोंबकळत असल्याचे, सिंगल फेज समस्याही वारंवार उद्भवत असल्याचे नागरिकांनी सांगितले. विविध कर आणि वाढत्या वीजबिलांचा आर्थिक भार सहन करूनही अपेक्षित सुविधा मिळत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
“महावितरणचा हा अंधारमय कारभार नेमका किती दिवस सहन करायचा?” तसेच “स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार?” असे सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
दरम्यान, महावितरण प्रशासनाने स्मार्ट मीटर संदर्भातील नागरिकांच्या शंकांचे निरसन करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.
