महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे चतुरबेट गावात मोठी दुर्घटना घडली आहे. गावातील श्री. विठ्ठल जाधव, श्री. गोविंद जाधव, श्री. चिमाजी जाधव आणि श्री. सीताराम जाधव यांच्या घरामागे नुकतीच बांधण्यात आलेली संरक्षक भिंत (रिटेनिंग वॉल) अतिवृष्टीमुळे अचानक कोसळली.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र संरक्षक भिंत पूर्णपणे कोसळल्याने संबंधित कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागातील जमीन खचत असून अशा घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा, नुकसानीचे योग्य मूल्यांकन करावे तसेच बाधित कुटुंबांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
यासोबतच परिसरातील धोकादायक ठिकाणांची तपासणी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
“सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेत झालेल्या आर्थिक नुकसानीची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन बाधित कुटुंबांना तातडीने मदत करावी,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
