सिन्नर (नाशिक) प्रतिनिधी :
मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर कर्तव्य बजावत असताना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान शाकिब पिरामद पठाण यांना वीरमरण आले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोनांबे गावासह संपूर्ण सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
जवान शाकिब पठाण हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि देशसेवेसाठी समर्पित जवान म्हणून ओळखले जात होते. देशाच्या सुरक्षेसाठी सेवा बजावत असताना त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या शौर्यपूर्ण कार्यामुळे संपूर्ण परिसरातून अभिमानासह हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शाकिब पठाण यांच्या वीरमरणाची बातमी गावात पोहोचताच ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले असून अनेकांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. देशसेवेसाठी त्यांनी दिलेले बलिदान भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत.
“जवान शाकिब पिरामद पठाण यांचे देशासाठीचे बलिदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या शौर्याला संपूर्ण देशाचा सलाम असून, त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो,” अशा शब्दांत नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
सिन्नर तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून वीर जवान शाकिब पठाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
