३० जून ते २९ जुलैदरम्यान माहिती पडताळणी; नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी नतिशा माथुर
परभणी | प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाला ३० जूनपासून प्रारंभ झाला आहे. या मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घराघरात जाऊन मतदारांची माहिती पडताळून पाहणार आहेत. नागरिकांनी आवश्यक माहिती व कागदपत्रांसह बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नतिशा माथुर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी पुनरीक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. मतदारांनी बीएलओ भेटीपूर्वी voters.eci.gov.in संकेतस्थळ किंवा ECINet App वर जाऊन स्वतःचा अथवा आई-वडिलांचा २००२ च्या विशेष पुनरीक्षणातील तपशील तपासून ठेवावा, त्यामुळे पडताळणी प्रक्रिया अधिक जलद होईल, असे त्यांनी सांगितले.
ज्या मतदारांचे किंवा त्यांच्या आई-वडिलांचे नाव पूर्वीच्या मतदार यादीत नसेल, त्यांनी जन्मदाखला, पासपोर्ट, दहावीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, शासकीय ओळखपत्र, कुटुंब नोंदवही, जमीन किंवा घर वाटपाचे प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, बँक, टपाल, एलआयसी किंवा शासनाने १ जुलै १९८७ पूर्वी दिलेले प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड यापैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणून तयार ठेवावे.
परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी या चार विधानसभा मतदारसंघांतील १,६२३ मतदान केंद्रांसाठी १,६२३ बीएलओ, १६३ बीएलओ पर्यवेक्षक आणि १३६ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या मोहिमेत जिल्ह्यातील १५ लाख ४१ हजार ७ मतदारांची सखोल पडताळणी करण्यात येणार आहे.
आतापर्यंतच्या मॅपिंगमध्ये १३ लाख ५५ हजार ८८६ (८७.९९ टक्के) मतदारांची माहिती पडताळण्यात आली असून २ लाख ६२ हजार ७७७ त्रुटी (Anomalies) आढळल्या आहेत. तसेच ७० हजार २८८ समान छायाचित्रांच्या नोंदी आणि ३८ हजार १०१ नॉन-स्टँडर्ड फोटो असलेल्या नोंदी निदर्शनास आल्या आहेत.
पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक
- ३० जून ते २९ जुलै २०२६: घराघरात पडताळणी
- ५ ऑगस्ट २०२६: प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन
- ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६: दावे व हरकती स्वीकारणे
- ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६: दावे-हरकतींची सुनावणी व निकाली काढणे
- ७ ऑक्टोबर २०२६: अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना बीएलओंना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देत मतदार यादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. अचूक, पारदर्शक आणि त्रुटीमुक्त मतदार यादी ही सशक्त लोकशाहीची पायाभरणी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
