मौदा | प्रतिनिधी
मौदा तालुक्यातील मोठी वर्दळ असलेल्या खात–पांजरा मुख्य रस्त्याची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे विशेषतः दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जड वाहनांची सततची वाहतूक आणि पावसामुळे खड्ड्यांची तीव्रता वाढल्याने गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा या समस्येकडे लक्ष वेधूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नसल्याचा आरोप होत आहे.
वाहनचालक व ग्रामस्थांनी संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
