पातूर | प्रतिनिधी
पाडशिंगी येथील शेतकरी भिका लालसिंग पवार व इतर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पेरलेल्या SOYABEAN INV-108 या सोयाबीन बियाण्याबाबत गंभीर तक्रार केली असून, बियाण्याच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त करत तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बियाणे आलेगाव येथील ऐका कृषी सेवा केंद्रातून खरेदी करण्यात आले होते. मात्र पेरणीनंतर बियाण्यात अपेक्षित उगवण न झाल्याने तसेच अन्य तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी कृषी विभागाकडे निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
- संबंधित शेताची तातडीने पंचनामा व प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी.
- बियाण्याचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावेत.
- चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित बियाण्याच्या विक्रीवर आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.
- संबंधित कंपनीने ४८ तासांच्या आत प्रभावित शेतकऱ्यांना दर्जेदार नवीन बियाणे उपलब्ध करून द्यावे किंवा झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी.
- दोषी आढळल्यास संबंधित कंपनी व विक्रेत्यावर बियाणे कायदा आणि इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास शेतकरी बांधवांसह पातूर कृषी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीस संबंधित प्रशासन व जबाबदार पक्ष उत्तरदायी राहतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
या प्रकरणात तातडीने चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी तक्रारदार शेतकरी भिका लालसिंग पवार आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी केली आहे.
