लोहारा तालुका | प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मागील खरीप हंगामातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असून, अद्याप लाभ न मिळाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. चालू खरीप हंगाम सुरू झाला असतानाही २०२५ मधील पीक विम्याची रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
यापूर्वी शासनाने सुरू केलेल्या ‘एक रुपयात पीक विमा’ योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर योजनेत बदल करून लागवडीखालील क्षेत्रानुसार विमा प्रीमियम भरण्याची व्यवस्था करण्यात आली. या बदलानुसार शेतकऱ्यांनी विमा भरला असला तरी मागील वर्षाच्या विम्याचा लाभ अद्याप मिळालेला नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, अनेकांनी उसनवारी करून किंवा आर्थिक अडचणींवर मात करत पीक विम्याचा हप्ता भरला. मात्र वर्ष उलटूनही नुकसानभरपाई न मिळाल्याने आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.
यासंदर्भात संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी प्रभावी पाठपुरावा करावा तसेच प्रलंबित पीक विम्याची रक्कम तातडीने वितरित करावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे.
दरम्यान, मागील वर्षाचा विमा अद्याप मिळालेला नसताना चालू वर्षाचा विमा भरण्याबाबतही अनेक शेतकरी साशंक आहेत. त्यामुळे शासनाने या प्रश्नावर तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.



