सांगली | प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची संततधार कायम असून गेल्या २४ तासांत चांदोली धरण परिसरात १२८ मिमी, तर पाथरपुंज येथे २१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे.
कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे सांगली जिल्ह्यातील ९ बंधारे पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या अनेक भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधित विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने धरण प्रशासन जलसाठ्याचा आढावा घेत असून आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे काही गावांचा संपर्क तात्पुरता विस्कळीत झाला आहे. नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहात उतरू नये, पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवरून वाहने नेण्याचा प्रयत्न करू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने पुढील २४ ते ४८ तासांत पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा आणि धरण परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

