जत | प्रतिनिधी
जत शहरातील मध्यवर्ती हनुमान मंदिरासमोरील ‘माही ज्वेलर्स’ या सराफा दुकानात रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीचा धाडसी प्रयत्न केला. मात्र दुकानात बसविण्यात आलेल्या आधुनिक सुरक्षा सायरनमुळे चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने लाखो रुपयांचा ऐवज वाचला. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री अडीच ते तीनच्या सुमारास चोरट्यांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला. शटर उघडताच सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होऊन सायरनचा मोठा आवाज झाला. त्यामुळे चोरटे घाबरून तेथून पसार झाले. पहाटे शेजाऱ्यांनी दुकानदाराला माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
दरम्यान, याच रात्री जत तालुक्यातील मुचंडी गावातही अज्ञात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून चोरी केल्याची घटना घडली. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
घटनेनंतर व्यापाऱ्यांनी नगरपरिषद आणि स्थानिक प्रशासनावरही नाराजी व्यक्त केली. मारुती चौकातील लोकप्रतिनिधींच्या निधीतून बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. कॅमेरे कार्यरत असते तर चोरट्यांचा माग काढणे अधिक सोपे झाले असते, असे मत माही ज्वेलर्सचे मालक मुसाजी याद शेख यांनी व्यक्त केले.
जत शहरातील बाजारपेठ, सराफा गल्ली आणि प्रमुख चौकांमध्ये रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, बंद असलेले सीसीटीव्ही तातडीने सुरू करावेत आणि चोरीच्या घटनांतील आरोपींना लवकरात लवकर अटक करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

