जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार नियोजन, वेळेत प्रशासकीय मान्यता आणि विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी यांना प्राधान्य देण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते मुंबई मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.
यावेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ तसेच जिल्ह्यातील आमदार आणि लोकप्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. प्रत्यक्ष बैठकीला जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, महानगरपालिका आयुक्त आदित्य जिवणे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, उपवनसंरक्षक तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्याने सलग चार वर्षे जिल्हा वार्षिक योजनेतील १०० टक्के निधी खर्च करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. ही कामगिरी प्रभावी नियोजन, सक्षम अंमलबजावणी आणि लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयामुळे शक्य झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी वर्षातही प्रत्येक विकासकामासाठी मंजूर निधीचा वेळेत आणि गुणवत्तापूर्ण वापर होणे ही सर्व विभागांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी खर्चाला गती द्यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
यावेळी महावितरण विभागाकडे मंजूर झालेल्या विकासकामांचा आढावा घेत, पूर्ण झालेली आणि प्रलंबित कामांची छायाचित्रांसह सविस्तर माहिती जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
