तेल्हारा | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ बु. आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभरात तब्बल १० ते १२ वेळा वीज ये-जा होत असल्याने नागरिकांसह विद्यार्थी मोठ्या अडचणीत सापडले असून महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरगुती कामे, शेतीची कामे तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
स्थानिक नागरिक तेजराव राऊत म्हणाले, “थोडी हवा किंवा पावसाचे शिंतोडे पडले तरी वीजपुरवठा खंडित होतो. महावितरणने या समस्येची तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा.”
या पार्श्वभूमीवर पिवंदळ बु. गावाचा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांची दुरुस्ती करावी आणि नागरिकांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
