लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर
पालघर | प्रतिनिधी :
जव्हार तालुक्यातील हिरडपाडा आणि सारसून ग्रामपंचायतींना जोडणाऱ्या लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलाची गेल्या २० वर्षांपासूनची मागणी अद्यापही प्रलंबित आहे. २००६ पासून सातत्याने निवेदने आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने संतप्त झालेल्या हिरडपाडा ग्रामस्थांनी आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
पिथोडी-दहाड मार्गावरील लेंडी नदीवर पूल नसल्याने हिरडपाडा व सारसून या दोन्ही ग्रामपंचायतींतील सुमारे ८ हजार नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सारसून ग्रामपंचायतीची सुमारे ४,५०० तर हिरडपाडा ग्रामपंचायतीची सुमारे ३,५०० लोकसंख्या या मार्गावर अवलंबून आहे. पूल नसल्यामुळे नागरिकांना १५ ते २० किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.
आरोग्य सेवांवरही या समस्येचा गंभीर परिणाम होत असून, गर्भवती महिलांना तसेच आपत्कालीन रुग्णांना वेळेत उपचारासाठी पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर दोन्ही गावांतील संपर्क पूर्णपणे तुटत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनते.
शिक्षण क्षेत्रालाही या समस्येचा फटका बसत आहे. गगणगीर येथील आश्रमशाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत असून, पावसाळ्यात हा प्रवास धोकादायक ठरत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांनाही नदीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या शेतांमध्ये जाणे, शेतीची अवजारे, खत, बियाणे व शेतमालाची वाहतूक करणे तसेच गुरे-ढोरे ने-आण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
या प्रश्नावर हिरडपाडा ग्रामस्थांच्या बैठकीत कल्पेश भोरे, प्रवीण मर्या भोरे, ज्येष्ठ नागरिक जाणू येशू माळी, गंगा येशू माळी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. हिरडपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती भोरे (माळी) तसेच सारसून ग्रामपंचायतीच्या सरपंच काकडी नवसू जंगली यांनीही पुलाच्या मागणीला पाठिंबा देत शासनाने तातडीने कायमस्वरूपी पुलास मंजुरी द्यावी, अशी मागणी केली.
ग्रामस्थांनी प्रशासनावर दोन दशकांपासून दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, पुलाच्या कामास तातडीने मंजुरी न मिळाल्यास आगामी निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
प्रतिक्रिया
भारती भोरे (माळी), सरपंच, हिरडपाडा ग्रामपंचायत :
“गेली २० वर्षे पुलासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. पूल नसल्यामुळे शिक्षण, आरोग्य, दळणवळण आणि शेतीवर गंभीर परिणाम होत आहे. शासनाने तातडीने पुलाच्या कामाला मंजुरी द्यावी. अन्यथा ग्रामस्थांच्या मतदान बहिष्काराच्या भूमिकेची जबाबदारी प्रशासनाची असेल.”
काकडी नवसू जंगली, सरपंच, सारसून ग्रामपंचायत :
“हिरडपाडा ग्रामस्थांची पुलाची मागणी पूर्णपणे रास्त आहे. विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने तातडीने कायमस्वरूपी पुलास मंजुरी द्यावी. सारसून ग्रामपंचायत या मागणीसोबत ठामपणे उभी आहे.”
