खेड | प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथे ६ जुलै २०२६ रोजी दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलीस, NDRF, स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर शोध व बचाव मोहीम सुरू केली.
बचावकार्यादरम्यान दरडीखालून एका महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर अडकलेल्या अन्य दोघांचा शोध सलग २१ तास सुरू ठेवण्यात आला. अखेर अथक प्रयत्नांनंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या संपूर्ण मोहिमेत रत्नागिरी पोलीस, NDRF, स्थानिक ग्रामस्थ आणि युवकांनी प्रतिकूल परिस्थितीतही जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू ठेवले. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करत शोधमोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण बचाव मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणांनी प्रभावी समन्वय साधत बचावकार्य पार पाडले.
या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात रत्नागिरी पोलीस दल सहभागी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
