कारंजा लाड | प्रतिनिधी
निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेला सुरुवात झाली असून, पावसाळ्यातही बीएलओ (बूथ लेव्हल अधिकारी) घराघरांत जाऊन मतदार नोंदणी व पडताळणीचे काम करत आहेत. मात्र, या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेले काही सहाय्यक बीएलओ अथवा संबंधित अधिकारी अपेक्षित सहकार्य करत नसल्याची तक्रार कारंजा लाड परिसरातून पुढे आली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सर्व कामाचा भार बीएलओंवरच पडत असून त्यामुळे मोहिमेच्या अंमलबजावणीत अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी व शेतमजूर राहत असल्याने त्यांना वेळेत भेटून आवश्यक माहिती व कागदपत्रांची पूर्तता करणे अधिक कठीण होत असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे शासनाने सहाय्यक अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि कार्यपद्धतीची दखल घेऊन निष्क्रिय अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, तसेच बीएलओंना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात संबंधित तहसीलदार व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून एसआयआर मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
