कारंजा लाड | प्रतिनिधी
कारंजा लाड तालुक्यात बोगस बियाण्याचा संशय व्यक्त करत एका शेतकऱ्याने नुकसानभरपाईची मागणी केली आहे. कृषी केंद्रातून खरेदी केलेल्या सोयाबीन बियाण्याची पेरणी करूनही एकही रोप उगवले नसल्याचा दावा संबंधित शेतकऱ्याने केला आहे.
शेतकरी शुभम दिलीप इचे यांनी चार एकर क्षेत्रासाठी इनोवेज (Innovage) कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र, पेरणीनंतरही शेतात एकही झाड उगवले नसल्याने त्यांना सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या घटनेमुळे संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, बियाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच संबंधित कंपनी आणि बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्राची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची कृषी विभागाने तातडीने दखल घेऊन पंचनामा करावा, बियाण्यांची गुणवत्ता तपासावी आणि चौकशीनंतर योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
