चामोर्शी | प्रतिनिधी
येनापूर महसूल मंडळातील अड्याळ, रश्मीपूर, किष्टापूर आणि सगनापूर ही गावे प्रस्तावित अप्पर तहसील आष्टीमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी, चामोर्शी यांच्याकडे लेखी आक्षेप नोंदवून ही गावे चामोर्शी तहसीलमध्येच कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

ग्रामस्थांच्या निवेदनानुसार, २३ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या उद्घोषणा पत्रामध्ये येनापूर महसूल मंडळातील काही गावे अप्पर तहसील आष्टीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, संबंधित गावांचा दैनंदिन व्यवहार, बाजारपेठ, बँकिंग सेवा, आरोग्य सुविधा तसेच विविध शासकीय कार्यालयांशी संपर्क हा प्रामुख्याने चामोर्शीशीच असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
निवेदनात अड्याळ ते आष्टी हे अंतर सुमारे १९ किलोमीटर, तर अड्याळ ते चामोर्शी हे अंतर केवळ १२ किलोमीटर असल्याचे सांगण्यात आले आहे. शेतीमालाची विक्री, बँक व्यवहार, आरोग्य सेवा आणि शासकीय कामकाजासाठी नागरिकांचा चामोर्शीशी दीर्घकाळापासून संबंध असल्याने ही गावे अप्पर तहसील आष्टीमध्ये समाविष्ट करणे व्यवहार्य ठरणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
शासनाने नागरिकांच्या भावना आणि प्रत्यक्ष अडचणींचा विचार करून अड्याळ, रश्मीपूर, किष्टापूर आणि सगनापूर ही गावे चामोर्शी तहसीलमध्येच कायम ठेवावीत, अशी मागणी निकेश गद्देवार, सुभाष मडावी (रश्मीपूर), सुनील कोसनकर (सगनापूर) आणि अशोक धानफले (किष्टापूर) यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
