चामोर्शी | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेवर शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून अत्याधुनिक पंपगृह, यंत्रसामग्री आणि विविध पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. मात्र, या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप समोर आला असून, यंत्रसामग्रीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रत्यक्ष पाहणीत प्रकल्प परिसरात कोणताही सुरक्षा कर्मचारी नसल्याचे दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच पंपगृह परिसरात प्रवेशावर प्रभावी नियंत्रण नसल्याने महागडी यंत्रसामग्री, विद्युत उपकरणे आणि इतर सार्वजनिक मालमत्तेची चोरी, तोडफोड किंवा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही उपसा सिंचन योजना महत्त्वाची मानली जात असली, तरी देखभाल आणि सुरक्षेकडे होत असलेल्या कथित दुर्लक्षामुळे भविष्यात प्रकल्पाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याबाबत संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, तसेच प्रकल्प परिसरात प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारून सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
