पलूस | प्रतिनिधी
श्री क्षेत्र किलेमच्छिंद्रगड येथील श्री जगद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळा मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती पालखी सोहळा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. तुकाराम महाराज मटकरी यांनी दिली.
पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. मल्हारी महाराज यांनी सांगितले की, पालखी सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून दिंडी चालकांनीही आपल्या-आपल्या दिंड्यांची तयारी पूर्ण केली आहे. तसेच पालखी सोहळ्यात सहभागी होणारा अश्वही सज्ज करण्यात आला आहे.
पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वारकरी व भाविक भक्तांना आवश्यक औषधे सोबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वारीदरम्यान स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच पालखी सोहळ्याचे सर्व नियम व अटींचे पालन करणे आवश्यक असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले.
तसेच सर्व दिंडीतील वारकरी व भाविकांनी १४ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत श्री क्षेत्र किलेमच्छिंद्रगड येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यास विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहितीही आयोजकांनी दिली.
