श्रीरामपूर | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी श्रीरामपूर पोलिसांनी विशेष धडक मोहीम राबवत १२१ अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड घेतली. या मोहिमेत प्रतिबंधात्मक कारवाईसह समुपदेशन करण्यात आले असून, गुन्हेगारांकडून प्रत्येकी ₹२ लाखांचे जामीन बंधपत्र घेण्यात आले.
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका एम. सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर अहिल्यानगर विभागातील १७ पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील १२१ अट्टल गुन्हेगारांची शनिवारी (दि. ४ जुलै) विशेष ओळख परेड आयोजित करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान प्रत्येक गुन्हेगाराची सविस्तर माहिती संकलित करण्यात आली. त्यासाठी इंटरोगेशन फॉर्म भरून त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी, सध्याचे वास्तव्य, रोजगार, व्यवसाय तसेच वापरातील वाहनांची माहिती नोंदविण्यात आली.
यावेळी कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या उपस्थितीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२९ अंतर्गत सर्व गुन्हेगारांकडून प्रत्येकी ₹२ लाखांचे जामीन बंधपत्र लिहून घेण्यात आले.
पोलिसांनी राबविलेल्या या विशेष मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून, नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत केले आहे.
