
शिरूर | प्रतिनिधी
शिरूर शहरातील अंगणवाड्यांमध्ये बालकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार पोषण आहार मिळत आहे का, याची खातरजमा करण्यासाठी नगराध्यक्ष ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांनी ९ आणि १० जुलै रोजी सलग दोन दिवस शहरातील दहा अंगणवाड्यांची अचानक पाहणी केली. या पाहणीदरम्यान स्वच्छता, पोषण आहार, नोंदवही, शौचालयांची स्थिती, गर्भवती महिलांच्या नोंदी तसेच अंगणवाडी सेविकांच्या कामकाजाची सविस्तर तपासणी करण्यात आली.
या धडक पाहणीवेळी उपनगराध्यक्ष मितेश गादिया, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती स्वप्नाली जामदार, नगरसेवक तथा शिक्षण समिती सदस्य सागर नरवडे, नगरसेविका सुनीता भुजबळ तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नगराध्यक्षांनी सांगितले की, बालकांच्या पोषणासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. त्यामुळे बालकांना दर्जेदार आहार, स्वच्छ वातावरण आणि आवश्यक सुविधा मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. याच उद्देशाने कोणतीही पूर्वसूचना न देता प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
पाहणीत निदर्शनास आलेल्या बाबी
पाहणीदरम्यान काही अंगणवाड्यांमध्ये खालील त्रुटी आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
- परिसर व स्वयंपाकघरात स्वच्छतेचा अभाव.
- पोषण आहाराच्या साठवणूक व वितरणामध्ये त्रुटी.
- काही ठिकाणी मुदतबाह्य खाद्यपदार्थ व बिस्किटे आढळल्याचा दावा.
- शौचालये व स्नानगृहांची अस्वच्छ स्थिती.
- गर्भवती महिलांच्या नोंदी अपूर्ण.
- २०२५ मधील पोषण किट अद्याप वापराविना पडून असल्याचे निदर्शनास.
- काही अंगणवाडी सेविकांच्या कामकाजात हलगर्जीपणा.
- मारुती आळी येथील एका अंगणवाडी सेविकेच्या वर्तणुकीबाबत नाराजी.
नगराध्यक्षांनी यापूर्वी १५ जून रोजीही अंगणवाड्यांची पाहणी करून स्वच्छता व पोषण आहाराबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही अनेक ठिकाणी अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मुंबई बाजार परिसरातील दोन्ही अंगणवाड्या स्वच्छ व समाधानकारक स्थितीत आढळल्याने तेथील सेविकांच्या कार्याचे नगराध्यक्षांनी कौतुक केले.
बालकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत नगराध्यक्ष ऐश्वर्याताई पाचर्णे म्हणाल्या, “स्वच्छता, पोषण आहार आणि मूलभूत सुविधांबाबत गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. संबंधितांना वारंवार सूचना देऊनही सुधारणा झालेली नाही. यापुढेही निष्काळजीपणा आढळल्यास नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल. बालकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे.”
या धडक पाहणी मोहिमेमुळे शहरात मोठी चर्चा सुरू असून, अंगणवाड्यांमधील सुविधा, स्वच्छता आणि पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रशासन अधिक सतर्क होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
