
अंबाजोगाई | प्रतिनिधी
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शेगाव येथून पंढरपूरकडे मार्गस्थ असलेल्या श्रीसंत गजानन महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी दुपारी अंबाजोगाई शहरात भक्तीमय वातावरणात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. पालखी आगमनानिमित्त शहरातील महिला, पुरुष आणि वारकरी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “ज्ञानेश्वर माऊली”, “तुकाराम”, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”, “संत गजानन महाराज की जय”, “गण गण गणात बोते” अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. वारकऱ्यांनी भक्तिभावाने अभंग व भजने सादर करत पालखी सोहळ्यात उत्साहाने सहभाग नोंदविला.
पालखीच्या मार्गावरील विविध ठिकाणी नागरिकांनी आणि भाविकांनी पालखीचे स्वागत करून पूजन केले. शेगावहून निघालेल्या या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी, टाळकरी, भगव्या पताका हातात घेतलेले भाविक तसेच अश्व सहभागी झाले आहेत. शिस्तबद्ध आयोजन आणि अध्यात्मिक परंपरा जपणारा हा पालखी सोहळा वारकरी संप्रदायातील महत्त्वाचा सोहळा मानला जातो.
यावर्षी पालखीचा मुक्काम अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात असून रात्री भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी श्रीसंत गजानन महाराजांची पालखी अंबाजोगाईतून पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासासाठी प्रस्थान करणार आहे.
