
भोकरदन | प्रतिनिधी
जालना जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकारातून आयोजित ‘नशाचे दुष्परिणाम’ या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ५३ शाळांमधील ४,३०० विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणीतून व्यसनमुक्त समाजाचा संदेश देत सामाजिक जाणीवेचे दर्शन घडविले.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा १० जुलै २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना येथील प्रशिक्षण कक्षात उत्साहात पार पडला. स्पर्धेतील उत्कृष्ट निबंध लेखनासाठी निवड झालेल्या १६० विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (होम) सचिन इंगोले, सुखदेव मंडलिक, केशव फिस्के, सुभाष पारे, वैशाली सरदार, सीमा कुलकर्णी आणि ज्योती चावडा यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचे नियोजन व प्रभावी सूत्रसंचालन संजय सोनवणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दामिनी पथक आणि जनजागृती पथकाने विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमातून व्यसनमुक्त समाजासाठी जनजागृती करण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. “नशेविरुद्धचा लढा हा केवळ पोलिसांचा नसून समाजातील प्रत्येक जागरूक नागरिक आणि विद्यार्थ्यांचा आहे,” हा संदेश विद्यार्थ्यांच्या लेखणीतून प्रभावीपणे उमटला.
ठळक बाबी
- ५३ शाळांचा जिल्हास्तरीय सहभाग
- ४,३०० विद्यार्थ्यांनी नशाविरोधी निबंध लेखन
- १६० विद्यार्थ्यांचा गौरव
- जालना पोलीस दलाचा समाजप्रबोधनाचा अभिनव उपक्रम
- विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



