कळंब | प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात हजारो वारकरी, महिला व भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
हातात भगव्या पताका घेऊन “गण गण गणात बोते” च्या जयघोषात दिंडीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
पालखीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनी वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहार तसेच इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करून सेवाभाव जपला.
सोहळ्यादरम्यान कळंब पोलिसांनी वाहतूक नियोजनासह चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे पालखी सोहळा शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
श्री संत गजानन महाराजांच्या नामस्मरणाने आणि भक्तीमय वातावरणाने संपूर्ण कळंब शहर दुमदुमून गेले.




