धारासूर | प्रतिनिधी
धारासूर येथील ऐतिहासिक व पुरातत्त्वीय महत्त्व असलेल्या गुप्तेश्वर मंदिराच्या जतन, संवर्धन व जीर्णोद्धाराच्या कामावर पुरातत्त्व विभागाकडून पुरेशी देखरेख होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही कामाच्या गुणवत्तेवर प्रभावी नियंत्रण नसल्याने ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी एकूण २८ कोटी ५८ लाख ९५ हजार रुपयांचा दोन टप्प्यांतील प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी १४ कोटी ७९ लाख ९५ हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून काम सुरू आहे. तर दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून त्यास अद्याप प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळालेली नाही.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गुप्तेश्वर मंदिर हे राज्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक वारशांपैकी एक असल्याने त्याचे जतन व जीर्णोद्धार पुरातत्त्वीय निकषांचे काटेकोर पालन करून होणे आवश्यक आहे. यासाठी पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित स्थळभेटी देऊन कामाची गुणवत्ता, वापरले जाणारे साहित्य आणि तांत्रिक बाबींची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात अधिकाऱ्यांच्या भेटी अत्यल्प होत असल्याची चर्चा परिसरात आहे.
कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना नियमित देखरेख न झाल्यास मंदिराचे मूळ ऐतिहासिक स्वरूप धोक्यात येऊ शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शासन आणि पुरातत्त्व विभागाने या प्रकल्पाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियमित निरीक्षण करावे, कामाच्या गुणवत्तेची खात्री करावी आणि आवश्यक त्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
धारासूर येथील गुप्तेश्वर मंदिर हे धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र मानले जाते. त्यामुळे जतन-संवर्धनाचे काम दर्जेदार व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण झाल्यास परिसरातील पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळू शकते. मात्र, कामात निष्काळजीपणा झाल्यास राज्याच्या मौल्यवान सांस्कृतिक वारशाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात पुरातत्त्व विभागाच्या नांदेड विभागातील अधिकाऱ्यांनी नियमित पाहणी करून कामाची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी तसेच दुसऱ्या टप्प्यातील निधीसही लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.





