रायगड | प्रतिनिधी :
रायगड जिल्ह्यात सलग सहा दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता पावसाने विश्रांती घेतली असली, तरी अतिवृष्टीचे परिणाम अद्याप कायम आहेत. रोहा, नागोठणे, माणगाव, महाड, पेण आदी भागांतील पूरस्थिती ओसरत असली तरी आता दूषित पाण्यामुळे जलजन्य साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
अतिवृष्टीमुळे नद्या, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहिल्याने अनेक घरे, बाजारपेठा तसेच पिण्याच्या पाण्याचे स्रोत पुराच्या पाण्याखाली गेले. पुराच्या पाण्यासोबत गाळ, चिखल, कचरा आणि सांडपाणी पाणीपुरवठ्याच्या स्रोतांमध्ये मिसळल्याने विहिरी, बोरवेल, तलाव आणि लहान पाणीपुरवठा योजना दूषित झाल्या आहेत. परिणामी अनेक ठिकाणी नळाद्वारे गढूळ व अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील प्रादेशिक नळपाणी योजना, जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना आणि ग्रामपंचायतींच्या स्थानिक पाणीपुरवठा व्यवस्थेवरही या परिस्थितीचा परिणाम झाला आहे. गढूळ पाण्यामुळे शुद्धीकरण केंद्रांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला असून पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया अधिक आव्हानात्मक बनली आहे.
आरोग्य विभागाच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत गंभीर मानली जात आहे. दूषित पाण्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ, टायफॉईड आणि कॉलरा यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला सर्व दूषित जलस्रोतांचे तातडीने शुद्धीकरण करून नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्याची माहिती दिली.
प्रशासनाने करावयाच्या उपाययोजना
- सर्व पाणीपुरवठा योजनांमध्ये प्रभावी क्लोरीनेशन करणे.
- विहिरी, बोरवेल, तलाव व सार्वजनिक जलस्रोतांचे निर्जंतुकीकरण करणे.
- दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या भागात सुरक्षित पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करणे.
- गावागावांत पाण्याचे नमुने तपासून आवश्यक सूचना जारी करणे.
- जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना सावध करणे.
- संभाव्य साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी वैद्यकीय पथके सज्ज ठेवणे.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
- पिण्याचे पाणी किमान १५ ते २० मिनिटे उकळूनच वापरावे.
- क्लोरीन गोळ्या किंवा अधिकृत निर्जंतुकीकरण पद्धतीचा वापर करावा.
- गढूळ किंवा रंग बदललेले पाणी पिणे टाळावे.
- हात व अन्नाची स्वच्छता राखावी.
- उलट्या, जुलाब, ताप किंवा पोटदुखीची लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत.
- विहीर किंवा अन्य जलस्रोत दूषित झाल्याचे आढळल्यास ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागाला त्वरित माहिती द्यावी.
पूराचे संकट कमी झाले असले तरी आता सुरक्षित पिण्याचे पाणी आणि जलजन्य आजारांपासून संरक्षण हीच जिल्ह्यासमोरील मोठी प्राथमिकता असल्याचे चित्र आहे.
