यवतमाळ | प्रतिनिधी :
वीज बिलाशी संबंधित तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महावितरणतर्फे यवतमाळ जिल्ह्यात सोमवार, १३ जुलै २०२६ रोजी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यात वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता रूपेश टेंभुर्णे यांनी केले आहे.
यवतमाळ विभागांतर्गत विद्युत भवन (यवतमाळ), बाबुळगाव, राळेगाव आणि कळंब येथे, पांढरकवढा विभागांतर्गत घाटंजी, मारेगाव, झरी जामणी, वणी आणि पांढरकवढा उपविभागात, दारव्हा विभागांतर्गत नेर, आर्णी, दिग्रस आणि दारव्हा उपविभागात तसेच पुसद विभागांतर्गत महागाव, ढाणकी, उमरखेड, पुसद शहर आणि पुसद ग्रामीण उपविभागात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील १९ उपविभागांमध्ये आयोजित या मेळाव्यात उपविभाग प्रमुख आणि बिलिंग कर्मचारी उपस्थित राहून वीज ग्राहकांच्या तक्रारी व शंकांचे निरसन करणार आहेत. तसेच स्मार्ट (टिओडी) मीटरमुळे वीजबिले वाढल्याच्या तक्रारींची तपासणी करून त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे.
महावितरणने स्पष्ट केले आहे की, स्मार्ट (टिओडी) मीटर पूर्णतः अचूक असून सामान्य वीज ग्राहकांसाठी फायदेशीर आहेत. दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळविण्यासाठी हे मीटर उपयुक्त ठरतात. औद्योगिक ग्राहकांकडे अशा प्रकारचे मीटर अनेक वर्षांपासून वापरात असल्याने नागरिकांनी मेळाव्यात सहभागी होऊन वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन अधीक्षक अभियंता रूपेश टेंभुर्णे यांनी केले आहे.
