
पातूर | प्रतिनिधी :
जून महिन्याच्या उत्तरार्धात झालेल्या पावसानंतर पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीन, तूर, उडीद आणि मूग या खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली. मात्र, पेरणीनंतर पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.
सुरुवातीच्या ओलाव्यावर उगवलेली पिके आता कडक उन्हामुळे व पावसाअभावी सुकू लागली आहेत. सिंचनाची सुविधा असलेल्या काही शेतकऱ्यांकडून विहिरी व कूपनलिकांद्वारे पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी तालुक्यातील बहुतांश शेती कोरडवाहू असल्याने हजारो शेतकऱ्यांचे लक्ष आता आभाळाकडे लागले आहे.
पावसाअभावी नदी-नाले कोरडे पडत असून विहिरींची पाणीपातळीही खालावत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनू लागला आहे.
पुढील चार ते पाच दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे करपण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट ओढवू शकते. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.










