छत्रपती संभाजीनगर : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील मुख्य रस्ता हा फुलंब्री, अजिंठा तसेच जळगावकडे जाणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. या रस्त्यावर दररोज हजारो प्रवासी, खासगी वाहने, बस, रिक्षा आणि मालवाहतूक वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या मध्यभागातून नागरिकांचे येणे-जाणे आणि रिक्षाचालकांकडून मुख्य रस्त्यावरच प्रवासी चढ-उतार करण्यात येत असल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
विशेष म्हणजे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी लोखंडी पादचारी पूल उभारण्यात आला आहे. तरीदेखील अनेक नागरिक पुलाचा वापर टाळून थेट मुख्य रस्ता ओलांडताना दिसून येतात. त्यामुळे भरधाव वाहनांच्या गर्दीतून रस्ता पार करताना नागरिकांचा जीव अक्षरशः धोक्यात येत आहे. भविष्यात येथे एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या मुख्य मार्गावर निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्येमुळे फुलंब्री, अजिंठा आणि जळगावकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागून प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत ही समस्या अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.
शहरातील या महत्त्वाच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि वाहतूक पोलीस विभाग यांच्यावर असून, संबंधित प्रशासनाने या ठिकाणी विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे, रिक्षांसाठी स्वतंत्र थांबा निश्चित करणे तसेच लोखंडी पादचारी पुलाचा वापर करण्याबाबत जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.
“लोखंडी पादचारी पूल असूनही मुख्य रस्त्यावरून जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडणारे नागरिक आणि वाढती वाहतूक कोंडी ही प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरत असून, मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे,” असे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे








