शहादा | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील मोहिदा शिवारातील समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या वस्तीगृहात रविवारी रात्री संशयित अन्न विषबाधेची घटना घडली. रात्रीचे जेवण केल्यानंतर सुमारे ४० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांना अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून, ते धोक्याबाहेर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणात शेवग्याची भाजी, भात आणि पोळी देण्यात आली होती. जेवणानंतर काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलट्या, मळमळ, चक्कर आणि अस्वस्थता जाणवू लागली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वस्तीगृह प्रशासनाने सर्व बाधित विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले. पाच विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले, तर इतर विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले. काही पालकांनी वस्तीगृहात निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आरोप करत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मिताली सेठी, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, प्रांताधिकारी दीपक गिरासे, तहसीलदार संभाजी पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच विविध लोकप्रतिनिधींनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.
दरम्यान, प्रशासनाने वस्तीगृहातील उरलेल्या अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून, विद्यार्थ्यांच्या आजाराचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. तपास अहवालानंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे समाज कल्याण विभागाच्या निवासी वस्तीगृहांतील अन्नाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.







