शहादा | प्रतिनिधी
शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान’ या विषयावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) देवगिरी प्रांत प्रदेश संघटक सिद्धेश्वर लटपटे यांनी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एल. पटेल होते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आपल्या व्याख्यानात सिद्धेश्वर लटपटे यांनी भारतीय इतिहासातील महान शिक्षणतज्ज्ञ व समाजसुधारकांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत चारित्र्य, आत्मविश्वास आणि ध्येय निश्चितीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. “भारत हा कृषिप्रधान देश होता, आहे आणि राहील. कृषी क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मनाची एकाग्रता, आत्मविश्वास आणि स्पष्ट ध्येय ठेवून पुढे वाटचाल करावी,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ओम येवले यांनी प्रास्ताविक करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या इतिहासासह सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी निधी राजेंद्र पाटील यांनी केले.







