शहादा | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पिंपरी येथे महावितरण कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादानंतर नत्थू लिमजी पाटील या वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणचे आठ कर्मचारी वीज जोडणी व मीटर तपासणीसाठी गावात आले होते. तपासणीदरम्यान कर्मचाऱ्यांमध्ये आणि काही ग्रामस्थांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे. याच वेळी झालेल्या धक्काबुक्कीत नत्थू लिमजी पाटील यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, संबंधित कर्मचाऱ्यांकडे तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि ओळखपत्र नव्हते तसेच त्यांनी अरेरावीची वागणूक दिली. या प्रकरणातील दोषींवर तातडीने निलंबनाची व कायदेशीर कारवाईची मागणी करत, ठोस निर्णय होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित कर्मचाऱ्यांना काही काळ रोखून धरत जाब विचारला. माहिती मिळताच पोलीस, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण आणि ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे. प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.







