येवला | प्रतिनिधी
येवला-मनमाड महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांची गैरसोय अद्यापही कायम आहे. पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते, तर आता उन्हाच्या तीव्रतेमुळे संपूर्ण महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. उडणाऱ्या धुळीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महामार्गाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. पावसाळ्यात चिखलामुळे वाहतूक धोकादायक झाली होती, तर आता रस्त्यावर साचलेल्या धुळीमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
जड वाहने आणि एसटी बस या मार्गावरून जाताच मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने मागून येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना समोरील रस्ता स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे काही काळ ‘ब्लाइंड स्पॉट’ निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर लहान-मोठे अपघात वारंवार घडत आहेत.
महामार्गावरील धूळ नियंत्रणासाठी नियमित पाणी फवारणी, रस्त्याची तातडीने दुरुस्ती आणि सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







