तेल्हारा | प्रतिनिधी
यंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यापासून आतापर्यंत तेल्हारा तालुक्यात सर्वाधिक १४१.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. समाधानकारक पावसामुळे बहुतांश ठिकाणी खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधानाचे वातावरण आहे. मात्र, पुढील काळात पावसाचे सातत्य राहील का, याबाबत चिंता कायम आहे.
जूनच्या सुरुवातीपासून झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले. काही भागांत मुसळधार, तर काही ठिकाणी संततधार पावसामुळे पेरण्या वाहून गेल्याच्या घटना घडल्या. मात्र, त्याचे प्रमाण तुलनेने कमी असून अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून पिके पुन्हा उभी केली आहेत.
दरम्यान, तालुक्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे अपेक्षित उगवण झाली नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.
या संदर्भात कृषी विभागाकडे तक्रारींचा ओघ सुरू असून, बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. तसेच आगामी काळात पावसाचे सातत्य राहावे, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करत आहे.






