
पाथरी | प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी तालुक्यातील लोणी येथे नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत शेती शाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महिला शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व, विषमुक्त अन्न उत्पादन, जैविक निविष्ठांचा वापर आणि शाश्वत शेतीच्या तंत्रांची सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात जागृती महिला शेतकरी गटाच्या वतीने जीवामृत आणि दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या प्रात्यक्षिकाला महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विशाल दलाल यांनी रासायनिक शेती आणि नैसर्गिक शेतीतील फरक स्पष्ट करत वाढता उत्पादन खर्च, जमिनीची घटती सुपीकता आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता नैसर्गिक शेतीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. विषमुक्त अन्न उत्पादनातून ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासोबतच शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरणही शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
सहाय्यक कृषी अधिकारी सुखदेव गिरी यांनी दहा ड्रम थेअरी, जीवामृत, दशपर्णी अर्क, लिंबोळी अर्क, चिकट सापळे, कामगंध सापळे आणि पक्षी थांबे यांच्या माध्यमातून नैसर्गिक व एकात्मिक कीड व्यवस्थापनाची माहिती दिली. यावेळी जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. नैसर्गिक निविष्ठांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढून रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते आणि उत्पादन खर्चात बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ब
दलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, पाणी बचत आणि नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पाअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचा वापर वाढविण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. तसेच कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
जागृती महिला शेतकरी गटाच्या कृषीसखी सरस्वतीताई मांयदळे आणि मंगलताई फुके यांनी स्वतःच्या अनुभवातून नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत, जमिनीची सुपीकता वाढ आणि पिकांच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे सांगितले.
या शेती शाळेमुळे महिला शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि शासकीय योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर मिळाल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कृषी विभागाच्या या उपक्रमातून विषमुक्त, पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीचा प्रभावी संदेश देण्यात आला.




