पालघर | प्रतिनिधी –
पालघर जिल्ह्यातील कुडण (ता. पालघर) परिसरात झालेल्या वादळी व मुसळधार पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे शेकडो केळीची झाडे जमीनदोस्त झाली असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
कुडण येथील शेतकरी अनिल मोरेश्वर म्हात्रे यांच्या सुमारे दोन एकर क्षेत्रातील १,५०० केळीच्या झाडांपैकी जवळपास ८०० झाडे वादळी वाऱ्यामुळे कोसळली. काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या या पिकाचे अंदाजे १.८० ते २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार राजेंद्र गावित यांनी नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शासनाकडून तातडीने पंचनामा करून योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कुडणचे चेअरमन हितेंद्र (बाळू) पाटील, उपाध्यक्ष शेखर राऊत, पोलीस पाटील कल्पेश म्हात्रे, सरपंच विजय म्हात्रे, ग्रामसेवक भागवत कांबळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल ठाकूर, निकिता पाटील, मुनीर बाळाशी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा सुरू करण्यात आला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, योग्य नुकसानभरपाई आणि पीकविमा योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वादळी पावसामुळे केळीबरोबरच इतर पिकांनाही फटका बसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून शासनाने त्वरित मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




