
पुणे प्रतिनिधी
शिरूर शहरातील महिला व बालकांना न्याय, सुरक्षा, पोषण, शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या अधिक सक्षम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच त्यांच्या विविध प्रश्नांचे शासनस्तरावर प्रभावी निराकरण व्हावे, या उद्देशाने शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांनी आमदार ज्ञानेश्वर (माऊलीआबा) कटके यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांची भेट घेऊन दोन महत्त्वपूर्ण निवेदने सादर केली.
यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशीही शिरूर शहरातील महिला व बालकल्याणाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा कलिम सय्यद, उपसभापती स्वप्नाली योगेश जामदार तसेच सामाजिक कार्यकर्त्या उषा वाखरे सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाडी केंद्रांचे नियंत्रण नगरपरिषदेकडे देण्याची मागणी
महिला व बालविकास मंत्र्यांना सादर केलेल्या पहिल्या निवेदनात शिरूर शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रांचे प्रशासकीय व व्यवस्थापकीय नियंत्रण शिरूर नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली. शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता अंगणवाड्यांमधील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, इमारतींची देखभाल, पूर्वप्राथमिक शिक्षण व आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे स्थानिक स्तरावर राबविणे शक्य होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
महिला बचत गटांकडे पोषण आहाराची जबाबदारी देण्याची मागणी
अंगणवाड्यांमधील बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना ताजा, पौष्टिक व दर्जेदार पोषण आहार वेळेत उपलब्ध व्हावा, यासाठी पोषण आहार तयार करण्याचे व वितरणाचे काम स्थानिक पात्र महिला बचत गटांकडे सोपविण्याची मागणी करण्यात आली. यामुळे स्थानिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
‘सखी वन स्टॉप सेंटर’ प्रभावीपणे सुरू करण्याची मागणी
दुसऱ्या निवेदनात केंद्र शासनाच्या ‘सखी वन स्टॉप सेंटर’ योजनेची शिरूर शहरात प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. या केंद्राद्वारे संकटग्रस्त महिलांना मानसिक समुपदेशन, कायदेशीर मदत, वैद्यकीय सहाय्य, तात्पुरता निवारा तसेच आपत्कालीन मदत उपलब्ध करून दिली जाते.
यासोबतच १८१ महिला हेल्पलाईन अनेकदा कार्यरत नसल्याची बाब मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देत ती तातडीने सुरळीत करण्याची मागणीही करण्यात आली.
महिलांच्या न्यायासाठी सातत्याने प्रयत्न
यावेळी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे म्हणाल्या, “शिरूरमधील प्रत्येक महिला आणि बालकाला न्याय, सुरक्षा, पोषण, शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या समान संधी मिळाव्यात, यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू राहील. आमदार ज्ञानेश्वर (माऊलीआबा) कटके यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या प्रत्येक प्रश्नाला शासन स्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
महिला आणि बालकांच्या हितासाठी शासन स्तरावर करण्यात आलेल्या या पाठपुराव्यामुळे शिरूर शहरातील अंगणवाडी व्यवस्थेची गुणवत्ता, महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
